रत्नागिरी जिल्ह्यात काँक्रिटचे जंगल ‘दुप्पट’; पर्यावरणाला धोक्याची घंटा, पाच वर्षांत शहरीकरण वेगात, ‘आयफॉरेस्ट’चा अहवाल!

रत्नागिरी दि. २६ :- रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी जमिनीच्या वापरात २०१७ ते २०२४ या सात वर्षांत सुमारे २७४.८ किमी जंगल क्षेत्र नष्ट झाले आहे. बांधकाम क्षेत्रात १०६ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
हिरवाईच्या क्षेत्रात मोठी घट नोंदविली आहे. शहरीकरण आणि बांधकामांचा वेग प्रचंड असून, अवघ्या सात वर्षांत हे क्षेत्र १९५ किमी वरून ४०५.६ किमीवर पोहोचले आहे. इम्पॅक्ट वेधशाळा २०२५ च्या आकडेवारीवर आधारित ‘आयफॉरेस्ट’ने केलेल्या विश्लेषणानुसार जिल्ह्यात नैसर्गिक प्रणालींवर मानवी हस्तक्षेप आणि शहरीकरणाचा दबाव प्रचंड वाढला आहे. ही बाब धोकादायक आहे.
जिल्ह्याचे वैभव असलेले झाडांचे आच्छादन वेगाने कमी होत आहे. २०१७ च्या तुलनेत २०२४ मध्ये सुमारे २७४.८ किमी जंगल किंवा झाडांचे क्षेत्र नष्ट झाले आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक २१६.६ टक्के वाढ झाली आहे. ८.४ किमी असलेले बांधकाम क्षेत्र आता २६.७ किमी झाले आहे.
खेड, चिपळूण, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्येही बांधकाम क्षेत्र दुप्पट झाले आहे. याच पाच वर्षांत वृक्षाच्छदनात मोठी घट झाली आहे. खेड तालुक्याने सर्वाधिक १८.५ टक्के (८८.९ किमी) वृक्षक्षेत्र गमावले आहे.


