रत्नागिरी
महाविद्यालयाची विविध क्षेत्रात भरारी- प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन

रत्नागिरी दि. ३ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर अभ्यासक्रम व अन्य विविध प्रकारचे बदल झाले आहेत. पाच विषयांमध्ये एमबीएची सुविधा, वर्षभरात ११ पुस्तकांचे प्रकाशन, नवीन शैक्षणिक धोरणानुसार व पीएम उषा योजनेअंतर्गत विविध विषयांवरील शैक्षणिक परिषदा घेण्यात आल्या. यामुळे महाविद्यालय प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक उपस्थित होते.

कार्यक्रमात होरायझन, प्रतिबिंब आणि सहकार या तीन वार्षिक अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. साखळकर म्हणाले की, महाविद्यालयाच्या दोन विभागांना आयएसओ मानांकन मिळाले. स्कूल कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत सायबर सुरक्षा विषयक माहिती विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली. पुस्तकांना आयएसबीएन क्रमांकही घेण्यात आले आहेत. बीबीए, बीपीए व एमबीए हे तिन्ही अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या लौकिकात भर घालत असून यातून रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.
याप्रसंगी वार्षिक अंकाविषयी माहिती, अंकाचे अंतरंग व घेतलेली मेहनत याबाबत मनोगत व्यक्त करण्यात आले. अंकासाठी विशेष सहकार्य करणाऱ्यांचे सत्कारही करण्यात आले.


