
रत्नागिरी दि. २८ :- जि. प. शाळा आदर्श वसाहत कारवांची वाडी नंबर दोन येथे मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. मराठी भाषेचा गौरव आणि जतन करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या विविध मराठी कवितांचे सुस्वर गायन सादर केले. त्यांच्या काव्यातील राष्ट्रप्रेम, मानवता आणि सामाजिक जाणीव यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
याशिवाय विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर मराठी भाषेच्या घोषणांनी दुमदुमून गेला. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आणि मराठी भाषा दिनानिमित्त सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, जिव्हाळा आणि जतन करण्याची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक श्रीमती स्मिता सावंत, श्रीमती रेणुका उपाध्याय आणि श्री दिनेश डोर्लेकर यांनी केले.



