
रत्नागिरी दि. १ :- नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही महायुतीकडून लढतोय. अनेक ठिकाणी युती आहे आणि अनेक ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. या निवडणुकीत राज्यात शिवसेनेला चांगला फायदा मिळणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ना. सामंत म्हणाले की, सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ५३ विक्रमी सभा घेतलेल्या आहेत. त्यांनी २० जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला असीम, आता पण सभा सुरू आहे आणि या सभांमध्ये ज्या पद्धतीने प्रतिसाद एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला त्याचा फायदा नक्कीच आमच्या स्वतःच्या पक्षाला शिवसेनेला होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या स्तरावर महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये माझी लाडकी बहीण असेल, एसटीत महिलांसाठी 50% सवलत असेल स्वयंरोजगारासाठी स्टायपेंड असेल, तसेच मुलींचे शिक्षण पूर्ण मोफत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रतिसाद एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला मिळालेला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनीदेखील आठ जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी देखील २२ सभा घेतल्या. आम्ही मंत्र्यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केलेले असून, आपण स्वतः ३६ सभा घेतल्या आहेत. सात ते आठ जिल्ह्यांमध्ये मी देखील जाऊन आलो आहे. त्याच्यामुळे एकंदरीत नगरपालिका नगरपंचायतीचे वातावरण बघता शिवसेनेला चांगला फायदा मिळणार आहे, ना. सामंत म्हणाले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते कुठे दिसले नाहीत. निवडणुकीआधीच त्यांनी पराभव मान्य केला असल्याचे चित्र दिसत आहे, असे ना. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.



