कृषीरत्नागिरी

देवरूखात २७ ऑक्टोबर रोजी आंबा व काजू मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन विषयक विशेष चर्चासत्र

देवरुख दि. २६ :- गेल्या पाच वर्षांत संगमेश्वर तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना मोहोर काळात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. चुकीच्या हवामानाचा परिणाम, कीडरोग व्यवस्थापनाबाबत दुर्लक्ष, तसेच फवारणी वेळापत्रकात असलेली अनास्था यामुळे सुंदर मोहोर डांबरासारखा काळवंडून गळून पडला आणि उत्पादनात प्रचंड घट झाली.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने “आंबा व काजू मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन” या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. वैभव शिंदे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला हे मार्गदर्शन करणार आहेत.

दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३०० वाजता पंचायत समिती देवरुख, छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

सकाळच्या सत्रात आंबा मोहोर संरक्षण व व्यवस्थापन, आणि दुपारच्या सत्रात काजू मोहोर संरक्षण व व्यवस्थापन यावर डॉ. शिंदे यांचे सविस्तर मार्गदर्शन होईल. यानंतर प्रश्नोत्तर आणि शेतकऱ्यांशी मुक्त चर्चा सत्र होईल.

मागील वर्षांचे धडे, पुढील वर्षाचे नियोजन: गेल्या काही वर्षांत तुडतुड्या आणि डागरोगामुळे तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर योग्य पद्धतीने संरक्षित केल्यास त्याचा आंबा मार्चमध्ये मिळून चांगल्या भावाने विक्रीस जातो त्यामुळे शेतकऱ्यांना थेट नफा मिळतो. याच उद्देशाने कंपनी हा कार्यक्रम आयोजित करत आहे.

काजू बाबतीत अजूनही अनेक शेतकरी फवारणीबाबत दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम म्हणजे काजूवर डाग, बीतील दर्जा घट आणि उत्पादन कमी.

कुडाळ तालुक्यातील शेतकरी प्रति झाड ३० ते ४० किलो काजू उत्पादन घेत असताना, संगमेश्वर तालुक्यात हे प्रमाण केवळ १० ते २० किलो इतके आहे ही चिंताजनक बाब आहे.

हे अंतर कमी करून संगमेश्वर तालुक्याला कोकणातील आघाडीचा फळबाग तालुका बनवणे हे कंपनीचे ध्येय आहे. कंपनीचा उद्देश शेतकऱ्यांच्या नफ्याची शेती या चर्चासत्राच्या माध्यमातून आंबा आणि काजू मोहोर संरक्षणाविषयी वैज्ञानिक आणि शाश्वत उपाय शेतकऱ्यांना मिळतील. “अगर आसान होता तो हर कोई किसान होता”, असे म्हटले जाते पण संगमेश्वर तालुका आज प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतीकडे वाटचाल करत आहे कंपनी त्या साठी शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे

शेतकऱ्यांना फक्त सल्ला नव्हे, तर वैज्ञानिक मार्गदर्शन, औषध व खतांचे वेळापत्रक, आणि बाजारपेठेतील थेट जोडणी उपलब्ध करून देत आहे.

हा उपक्रम संगमेश्वर नैसर्गिक शेती गट व संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

संगमेश्वर नैसर्गिक शेती गट प्रमुख हेमंत तांबे आणि कंपनीचे चेअरमन विलास शेलार यांनी सांगितले की – “हे दिवस मोहोर संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुर्लक्ष करू नका, टाळू नका. तुमच्या बागेचा, तुमच्या नफ्याचा विचार करून या चर्चासत्रात जरूर सहभागी व्हा.”

हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी विनामूल्य असून, उपस्थितांनी स्वतःचे पाणी व दुपारचे जेवण सोबत आणावे, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button