रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात “अतिसार थांबवा मोहीम” सुरू

रत्नागिरी दि. १६ : देशातील पाच वर्षांखालील बालमृत्यूंपैकी सुमारे ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे अतिसारामुळे होतात. अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये अतिसार प्रतिबंध व नियंत्रणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत दरवर्षी “अतिसार थांबवा मोहीम” राबविण्यात येते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष श्री. विलास चाळके,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये ,अतिरिक्त , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात दि. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत “अतिसार थांबवा मोहीम” राबविण्यात येणार आहे.

सदर मोहिमेअंतर्गत प्रशिक्षित आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, घरोघरी भेट देऊन अतिसार प्रतिबंधाबाबत माहिती व आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. तसेच हात धुण्याच्या योग्य पद्धतीची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात येणार आहेत. भेटीमध्ये अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्यांचे मोफत वितरण केले जाणार आहे.

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व जनजागृतीसाठी समाज माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 अतिसार नियंत्रणासाठी हे करा..

 पाणी उकळून गाळूनच पिण्यासाठी वापरा. पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करा.

 ओ.आर.एस.( क्षारसंजीवनी) चा वापर करा.

 पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन किवा मेडीक्लोर चा वापर करा.

 उघड्यावरचे तसेच शिळे अन्नपदार्थ खाऊ नका.

 वैयक्तिक स्वच्छता पाळा.उदा.हात धुणे .

 नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करा.

–( डॉ. अनिरुद्ध आठल्ये), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button