रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गुन्हे तपासातील प्रभावी कामगिरी
भाग 1 ते 5 मधील 92.35% तर भाग 6 मधील 96.75% गुन्ह्यांचा तपास पूर्ण

रत्नागिरी दि. २८ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा दर्जेदार, परिणामकारक व वेळेत तपास करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आढाव्यानुसार, जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश मिळविले आहे.
दिनांक 31 मार्च 2025 ते 01 एप्रिल 2026 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात भाग 1 ते 5 अंतर्गत एकूण 1,777 गुन्हे दाखल झाले होते. यापैकी 92.35% गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे व केवळ 136 गुन्हे प्रलंबित असून प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण फक्त 7.65% आहे.
तसेच भाग 6 अंतर्गत (दारुबंदी गुन्ह्यांसह) एकूण 2,552 गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 96.75% गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे व केवळ 83 गुन्हे प्रलंबित असून प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण फक्त 3.25% आहे. ही अत्यंत समाधानकारक व उल्लेखनीय कामगिरी आहे.
या सर्व गुन्ह्यांच्या तपासवर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांचे प्रभावी पर्यवेक्षण व सातत्यपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच, सर्व तपासी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या गुन्ह्यांचा जलद, सखोल व गुणवत्तापूर्ण तपास तसेच त्यांच्या प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जलद न्याय मिळावा, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करता यावी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे व रत्नागिरी जिल्हा पोलीस दल भविष्यातही गुन्हे तपासातील गुणवत्ता, गती आणि परिणामकारकता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहे.


