१२ एप्रिल रोजी लाजुळ नरमे येथे जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धेचे आयोजन

विल्ये दि. ४ (अमित कांबळे) :- भीमशक्ती जलसा कला निकेतन मंडळ रत्नागिरीच्या माध्यमातून जलसा निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्ष शुभारंभ निमित्त आयोजित “गीत बहार सप्तसुरांचा पर्व-१” जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायं- ७:३० वा. आनंदनगर लाजुळ नरमे रत्नागिरी येथे होणार असून या स्पर्धेकरिता नाव नोंदणी करणाऱ्या १५ जलसा मंडळांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात येणार आहे ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच १५ पेक्षा अधिक एकूण १९ जलसाकार मंडळींनी आपले नाव नोंदणी केली, आणि आयोजकांना कार्यक्रम रूपरेषेतील मंडळाची नोंदणी पूर्ण झाली असे जाहीर करावे लागले.
जलसाकार मंडळींचा हा उत्साह पाहता नव्या पिढीला ही जलसा या प्रबोधनी माध्यमाचे आकर्षण पुन्हा नव्याने होत असलेले वास्तव समाज मनातून स्पष्ट होत आहे. या स्पर्धेत प्रत्येक मंडळांने निवेदनासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर आधारित १- गीत आणि माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १- गीत असे सादरीकरण १५ मिनिटात करायचे आहे, सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकास -७१०१/रुपये रोख,आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र, द्वितीय क्रमांक- ५१०१/रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र, तृतीय क्रमांक- ३१०१/ रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र, तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक – १०००/रुपये,आकर्षक सन्मान चिन्ह व गौरव पत्र,द्वितीय उत्तेजनार्थ – १०००/रुपये,आकर्षक सन्मान चिन्ह व गौरव पत्र.तसेच उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट ढोलकी वादक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांनाही प्रत्येकी ५००/ रुपये रोख बक्षीस आणि गौरव पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा कार्यक्रम आयोजक मंडळातील विजय रामचंद्र सावंत (गुरुवर्य ),गौतम पांडुरंग सावंत (कवी), सुधाकर शंकर सावंत (कवी/गायक) आणि भीमशक्ती जलसा कलानिकेतन लाजूळ रत्नागिरी यांच्याकडून पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध जलसाकार मंडळींकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयोजकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



