रत्नागिरी

मुकुल माधव फौंडेशन यांच्यातर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी भाट्ये समुद्रकिनारी विशेष मार्ग

रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरीतील जवळच असणारा भाट्ये समुद्रकिनारा हा सगळ्यांनाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत चालला आहे.  येथे मोठ्या प्रमाणात  पर्यटक येत असतात त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींचाही समावेश असतो. समुद्रकिनाऱ्यावरील सुकी वाळू दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणे कठीण करणारी ठरते. त्यामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचणे अनेकदा शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने विशेष रबरचा वॉकवे (चालण्याचा मार्ग) बसविण्यात आला आहे. या मार्गामुळे पर्यटकांना, विशेषतः दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना, सुरक्षितपणे समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन पाण्याचा आनंद घेणे आता शक्य होणार आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज मुकुल माधव फाउंडेशन गेली 30 वर्ष आरोग्य, शिक्षण, पर्यावरण पूरक उपक्रम, सामाजिक उपक्रम यामध्ये पूर्ण भारतात काम करत आहे गेली १० वर्षे विकलांग मुलांसाठी मिशन सेरेबल पालसी या उपक्रमातून सातारा ,रत्नागिरी, गोवा, गुजरात येथे १००० पेक्षा जास्त मुलांचे उपचार व थेरपी करत आहेत.  याच अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी भाट्ये  बीचवर एक दिवसीय सहलीचे आयोजनही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध खेळ, उपक्रम आणि निसर्गानुभव यांचा मनमुराद आनंद घेतला. या सहलीला मुकुल माधव विद्यालय व फिनोलेक्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिव्यांग मुलांना करमणुकीचाही आनंद दिला.  समुद्र, वाळू आणि निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठीच हा ट्रॅक समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेण्यात आल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

कार्यक्रमाला भाट्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रीती  पराग भाटकर, ग्रामपंचायत सदस्य  सर्व शिक्षा अभियान समन्वयक श्री.कांबळे, श्री.सचिन सारोळकर,  फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते. मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू प्रकेश छाब्रिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button