रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ४५९८ वनराई बंधारे
संकल्पपूर्ती सोहळ्यास अमृता फडणवीस, संजय राठोड उपस्थित

ठाणे, दि. १९ :- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह सहा राज्यांत ४५९८ वनराई बंधारे बांधण्यात आले. अतिशय अल्पावधीत पूर्ण केलेल्या या उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा ठाणे येथील टीपटॉप प्लाझा येथे आज झाला.
या सोहळ्यास जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह सौ. अमृता फडणवीस व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते. अतिशय उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी कच्चे बंधारे निर्मितीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या रामानंदाचार्य सांप्रदायाच्या पिठांचा, जिल्हा समित्यांचा, तसेच तालुके आणि सेवा केंद्रांचा सन्मान करण्यात आला.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे ७ ते २१ डिसेंबर २०२५ या पंधरावड्यात महाराष्ट्रासह सहा राज्यांत ४५९८ एवढे विक्रमी वनराई बंधारे बांधण्यात आले.
या प्रसंगी जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, “जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेले देशहिताचे, तसेच निसर्ग रक्षणाचे कार्य अतिशय मोलाचे आहे. या कार्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की शासनाच्या उपक्रमांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे कार्य अतिशय अभिमान वाटावा असे व कौतुकास्पद आहे.”
सौ. अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या, “ जगद्गुरूंनी अध्यात्माबरोबरच लोकांच्या जीवनात मानसिक बदल केले. त्यांच्या जीवनशैलीत बदल केले आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे त्यांच्या प्रेरणेतून बांधले गेलेले हे वनराई बंधारे आहेत. जगद्गुरूंनी जनकल्याणाच्या वेगवेगळ्या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यातून पेटून उठून काम करण्याची गरज आहे.”
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीं आपल्या आशीर्वादपर मनोगतामध्ये म्हणाले, “हे हजारो वनराई बंधारे सजीव सृष्टीसाठी संजीवनी आहेत. आजचा दिवस मानवधर्म व राष्ट्रधर्म यांच्या मिलाफाचा ऐतिहासिक क्षण आहे. माझ्या अनुयायांनी श्रमातून भगिरथ कार्य केले आहे. या बंधाऱ्यांच्या रुपाने पाणी अडवून व पाणी जिरवून एकप्रकारे धरणीमातेला अभिषेक केला आहे. पाणी हे चैतन्य आहे. या कार्याने ऐन उन्हाळ्यात माणसांच्या बरोबरच पशुपक्ष्यांनाही पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या विहिरींचा पाणीसाठा वाढला आहे. ज्या हातांनी दगड माती उचलून चिखलगाळ उपसून कच्चे बंधारे बांधले आहेत ते हात खऱ्या अर्थाने पवित्र झाले आहेत.”
कार्यक्रमाला जिल्ह्यातून तसेच सहा राज्यांच्या विविध भागांतून भाविक आले होते. कार्यक्रमासाठी आकर्षक संतपीठ उभारले होते. यावेळी बंधारे उभारणीत उत्तम कार्य केलेल्यांचा गौरव करण्यात आला.



