रत्नागिरीराजकीय

चिपळुणातील वहाळ जि. प. गटात उबाठाला खिंडार; प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत दाखल

चिपळूण दि. २४ :- तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. वहाळ जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे एकहाती वर्चस्व असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका उबाठाला मोठा धक्का देणारी ठरली आहे. या निमित्ताने संदीप सावंत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे नंतर वहाळ जिल्हा परिषद गट हा राजकीय प्रतिष्ठेचा मानला जातो. हा जिल्हा परिषद गट गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने सहाजिकच या गटाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. तसेच सावर्डे,कोकरे हे जिल्हापरिषद गट वहाळ गटाला जोडून आहेत. त्यामुळे वहाळ जिल्हा परिषद गट हा नेहमीच चर्चेत राहिला असून आमदार भास्करशेठ जाधव यांचा हा गड समजला जातो.

संदीप सावंत हे थेट सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात असलेले नेतृत्व असून त्यांनी नुकतेच पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार सुभाष बने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा पासूनच त्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम करण्यास सुरुवात केली होती. आता तर त्यांनी उबाठाचे प्रमुख मोहरे टिपले असून वहाळ जिल्हापरिषद गटात आम.जाधव यांना जोरदार दणका दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी वहाळ गटातील उबाठाचे कळंबट शाखाप्रमुख बाबुराव घाणेकर, मुर्तवडे शाखाप्रमुख अशोक पांचाळ, कळंबट-घवाळगाव शाखाप्रमुख संदीप निर्मळ, तोंडली शाखाप्रमुख दिलीप कांबळे, वीर शाखाप्रमुख अंकुश घेवडे, कळंबट उपशाखाप्रमुख महेश पिलवलकर, मुर्तवडे उपशाखाप्रमुख दीपक पांचाळ, कळंबट केंद्रप्रमुख महेश काटदरे, कळंबट बूथप्रमुख विश्वनाथ शिरकर, वीर बुथप्रमुख पांडुरंग दुर्गुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button