ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण निरोप

जैतापूर दि. २८ (राजन लाड ) :- मालवणी रंगभूमीचा पाया रचणारे, मालवणी भाषा साता समुद्रापार पोहोचवणारे,असंख्य कलाकारांना संधी देणारे आणि मराठी नाट्यजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी दुर्दैवी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी, तसेच कोकणातील रत्नागिरी–सिंधुदुर्गातील शेकडो नाट्यप्रेमी आणि गवाणकरप्रेमी यांनी उपस्थित राहून या थोर नाटककाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर त्यांचे पार्थिव दहिसर (पूर्व) येथील निवासस्थानी नेण्यात आले, जिथे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र यांनी शेवटचा निरोप दिला. दहिसरच्या अंबावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्यासह मराठी रंगभूमीवरील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना अॅड. शेलार म्हणाले “गंगाराम गवाणकर हे कोकणच्या मातीतील एक अनमोल रत्न होते. त्यांच्या स्मृती, कार्य आणि साहित्य वारशाला महाराष्ट्र सरकारतर्फे योग्य तो मान मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन हे त्यांचे मूळ गाव. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ते उभे राहिले आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी रंगभूमीवर दैदिप्यमान स्थान मिळवले. ९६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, तर झी मराठी जीवनगौरव पुरस्कारासह शेकडो पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला.
गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या माडबन येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तीन नवीन नाटके लिहून ती रंगमंचावर आणली, तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळवून दिली. त्यांच्या लेखणीतून उभ्या राहिलेल्या ‘वेडी माणसे’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’ आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर नवा अध्याय रचला.
गवाणकर यांच्यावर पु. ल. देशपांडे यांचा प्रभाव होता. “पु. ल. देशपांडे यांच्या परिसस्पर्शाने माझ्या जीवनाचं सोनं झालं,” असं ते नेहमी सांगत असत. त्यांचे मधुभाई कर्णिक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या प्रेमाखातर मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही त्यांच्या माडबन येथील निवासस्थानी भेट दिली होती.
गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक संवेदनशील नाटककार, कलावंतांचा मार्गदर्शक आणि मालवणी संस्कृतीचा सच्चा प्रहरी गमावला आहे. त्यांच्या लेखणीचा प्रकाश आणि नाटकांची गंधर्व परंपरा कोकणाच्या आकाशात कायम झळकत राहील.



