रत्नागिरी

रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांचे निर्देश

रत्नागिरी नगर परिषदेकडून तात्काळ कामाला सुरुवात

रत्नागिरी, ६ : रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर येथे आयोजित या बैठकीत, उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी ऐकून घेत अनेक समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे रत्नागिरीतील व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी नगर परिषदेकडून तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांपैकी राम आळीतील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात झाली.

या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह बिपीन बंदरकर, निमेश नायर, सुदेश मयेकर, विजय खेडेकर तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे सव्वातास चाललेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचला.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख तक्रारी आणि समस्या:

रस्त्यांची दुरवस्था: शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खराब झालेले रस्ते यामुळे ग्राहकांवर प्रचंड परिणाम होत असून व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली.

राम आळीतील गटार समस्या: राम आळीतील गटारे बुजल्यामुळे बस स्थानकाकडून येणारे सर्व पावसाचे पाणी राम आळीच्या रस्त्यावरून वाहत नदीचे स्वरूप घेत असल्याने मोठी गैरसोय होते.

रस्तारुंदीकरण रखडले: सावरकर पुतळा ते तेली आळी नाका या रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

शौचालयांची दुरवस्था: बाजारपेठेमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व्यवस्थित राखली जात नाही, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

विजेची अपुरी व्यवस्था: बाजारपेठेतील रस्त्यांवर योग्य प्रमाणात लाईट नसल्यामुळे संध्याकाळच्या वेळी समस्या उद्भवतात.

पार्किंगची समस्या: पार्किंगच्या जागेवर अतिक्रमणे झाल्यामुळे ग्राहकांना पार्किंगची सोय मिळत नाही आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे.

उद्योगमंत्र्यांकडून ठोस आश्वासने आणि तात्काळ उपाययोजना:

व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

रस्त्यांची दुरुस्ती: सध्या शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कामाला विलंब झाला असला तरी, लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांच्या राहिलेल्या भागाचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

राम आळीतील गटार काम: राम आळी येथील गटाराच्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम लवकरच सुरू होईल, असे सामंत यांनी आश्वस्त केले.

अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश: पार्किंगच्या जागेवर असलेल्या मटका टपरीला तात्काळ उचलण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

पार्किंग नियोजनाचे आदेश: बाजारपेठेसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्लान तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

मारुती आळी रस्तारुंदीकरण: मारुती आळी येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी येथील खातेधारकांनी तयारी दर्शवल्यास, तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासनही सामंत यांनी दिले.

राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले. या बैठकीमुळे रत्नागिरी शहरातील व्यापारी आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button