रत्नागिरी

‘पीएचसी’मधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठविणाऱ्यांवर होणार कारवाई

२ कॉर्डीयाक, १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या; जिल्हा शासकीय रुग्णालयाचे काम चांगले - पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १६  : जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या 2 वर्षापूर्वीपेक्षा सद्याचे काम चांगले आहे. गुढघारोपण सारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. ही कौतुकाची बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयाला फायदा झाला असून, 145 डॉक्टर्स काम करत आहेत. 2 कॉर्डीयाक आणि 12 सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्यावा, असे सांगतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयाकडे डिलीव्हरीसाठी पाठविणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यासाठी भरारी पथक ठेवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात काल पालकमंत्री डॉ. सामंत यांनी काल आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय (सनियंत्रण व सल्लागार) समिती सदस्य, जि. प. सदस्य हर्षदा गावडे, श्रध्दा मोरे, नगरसेवक अभिजीत दुडे, सुहेल मुकादम, बंड्या साळवी, सागर भिंगारे, संपदा तळेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, समिती सदस्यांनी रुग्णांशी बोलून त्यांच्या अडीअडचणी समजून त्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितल्या पाहिजेत. महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत असतात का, रुग्णांच्या अडचणी रुग्णांसाठीच्या सुविधा या विषयी देखील समिती सदस्यांनी देखरेख केली पाहिजे.

गरीब, गरजू रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार व्हायला हवेत. जर कोणी खासगी रुग्णालयाकडे रुग्ण पाठवित असतील, तर ते तपासा. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करा. रुग्ण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्या. शासकीय रुग्णालयात सध्या 145 डॉक्टर्स उपलब्ध आहेत. आरोग्य व्यवस्था सुधारली आहे. जिल्हा रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया, गुढघारोपण यशस्वी होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी देखील जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत.

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत चौकशी

ऑडीओलॉजीस्ट तपासणी नसल्याने ज्या दिव्यांगांची पेन्शन थांबली आहे, त्यांच्यासाठी सिंधुदूर्ग, कोल्हापूर येथून ऑडीओलॉजीस्ट बोलावून शिबिर घ्यावेत आणि प्रथम प्राधान्याने त्यांची तपासणी करुन त्यांची पेन्शन सुरु करा. दिव्यांगांच्या प्रमाणपत्रामध्ये काहीजणांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी वाढलेली आहे, काही जणांची कमी झालेली आहे. याची चौकशी केली जाईल. पूर्वीची आणि आताची याबाबत फेरतपासणी केली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कसबा संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आढावा

कसबा संगमेश्वर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी एमआयडीसी विश्रामगृहात काल घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे सा.बां. विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्र.जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील आदी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता श्री.ओटवणेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रस्तावित स्मारकाबाबत माहिती दिली. शास्त्री पूल येथे स्मारक प्रवेशद्वार, शास्त्री पूल ते संगमेश्वर मंदिर –रस्त्याचे मजबुतीकरण व सुशोभिकरण, अस्तित्वातील ग्रामपंचायत व श्री. सरदेसाई घर दर्शनी भाग सुशोभिकरण, सरदेसाई वाडा कसबा येथील 5 एकर परिसरातील स्मारक निर्मिती, श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथालय, संग्रहालय जवळील नदीलगत घाट विकसित करणे, स्मारक परिसरातील मंदिरांचे जतन व संवर्धन करणे, संपूर्ण स्मारक परिसरामध्ये पादचारींकरिता दगडी/जांभा पाखाडी निर्माण करणे आदीबाबतचा सविस्तर आढावा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी घेतला.

याबाबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. उपलब्ध 5 कोटीच्या निधीतून कमान, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण आणि उपहारगृह, प्रसाधनगृह व इतर सोयीसुविधा निर्माण करणे ही कामे करुन घ्या, अशा सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button