
रत्नागिरी दि. २५ :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे महायुती समन्वयक समितीची बैठक संपन्न झाली.
त्यावेळी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकसंघपणे, विजयाच्या निर्धाराने लढण्याचा संकल्प करण्यात आला. महायुतीतील जिल्ह्यातील जागावाटप हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पूर्ण समन्वयाने ठरले असून, पक्ष शिस्त आणि विश्वास हाच आपल्या विजयाचा पाया आहे, हे या बैठकीत ना. उदय सामंत यांनी ठामपणे अधोरेखित केले.
जर आपण तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट व २० पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणले, तर या यशाचे संपूर्ण श्रेय देवेंद्रजी फडणवीस व एकनाथजी शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाला जाणार आहे. हा विश्वास आणि निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला. महायुतीची ही एकजूटच विजयाची हमी आहे.
सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम केल्यास काय परिणाम साधता येतो, हे आपण नगरपरिषद निवडणुकीत अनुभवले आहे. तोच अनुभव, तोच आत्मविश्वास आणि ऊर्जा घेऊन महायुती आगामी निवडणुकीत जनतेसमोर जायचे आहे, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.
या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड विलास पाटणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुदेश मयेकर, तालुका अध्यक्ष बंडयाशेठ साळवी, बाबू म्हाप, भाजप तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, भाजप महिला अध्यक्ष वर्षाताई ढेकणे, संजू साळवी, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



