
राजापूर दि. १७ :- राजापूर तालुक्यातील कसवली ग्रामपंचायतीचे सरपंच देवेश तळेकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शिवसेनेत प्रवेश करताना देवेश तळेकर म्हणाले, “आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सातत्याने विकासाचे काम सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारा आणि लोकांपर्यंत थेट पोहोचणारा पक्ष म्हणजे शिवसेना त्यामुळे गावाच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “ग्रामपातळीवरील नेतृत्वाने शिवसेनेत दाखल होणे म्हणजे विकासाच्या वाटचालीला बळ मिळणे आहे. देवेश तळेकर यांचा प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार किरण सामंत म्हणाले, “राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू आहे. देवेश तळेकर यांच्यासारखे तरुण नेतृत्व शिवसेनेत दाखल झाल्याने पक्ष अधिक मजबूतजी होईल,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य विलास चाळके, राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले, मंदार सप्रे, विभाग प्रमुख मनीष लिंगायत, सौरभ सोरप,राजापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



